top of page
Writer's pictureMahannewsonline

लसीकरणाला सरसकट परवानगी द्यायला हवी....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली ? याचा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना केला. तसेच लसीकरणाला सरसकट परवानगी द्यायला हवी, लसीकरणाला वयाचं बंधन नसावं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.आहे.

“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद केला, यावेळी आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.


पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे ...

  • महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात तिथे कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे.

  • मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही.

  • छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.

  • लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची?

  • बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी

  • शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा, 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना पास केलं पाहीजे

  • ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा.

  • खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी आणि जिम सारख्या जागा जिथे विशेष गर्दी न होता जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी

  • कंत्राटी कामगारांना सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं.

  • मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका.

  • परमबीर सिंग ह्यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस कमिशनर पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे.

  • मला काल एक विनोद एकाने सांगितला, 'सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?

  • 'हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही.अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत

  • माझे पक्षातील सहकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला ह्याचं नाव आलं आहे. ह्याच पदाधिकाऱ्यांचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं.

  • ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावं.राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे.


bottom of page