खासगी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार; राजस्थान सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने आरोग्यसेवेवर ताण पडत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कोरोना रुग्णांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. चिरंजीवी आरोग्य विमा योजना अंतर्गत राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय गेहलोत सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी मान्यता प्राप्त रुग्णालयांमध्ये चिरंजीवी योजनेशी जोडले गेलेल्या कुटुंबाला कोरोनावरील उपचारासाठी नवं पॅकेज मंजूर केलं आहे. या आदेशाचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कठोर पाऊल उचललं जाईल, असा इशाराही राजस्थान सरकारने दिला आहे.
राजस्थान सरकारने 1 मे 2021 पासून चिरंजीवी योजनेची सुरुवात केली आहे. सरकारच्या या विमा योजनेशी आतापर्यंत 22 लाखापेक्षा अधिक कुटुंब जोडले गेले आहेत. 3 हजार 500 कोटी रुपयांच्या या योजनेत राज्यातील प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक विमा कव्हर मिळणार आहे.