…तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर पडू देणार नाही
कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली आहे. राज्याला गरज असताना केंद्राकडून पुरेशी लस पुरवली जात नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लसीविना बंद करण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील आकडेवारीच जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना इशारा दिला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात असल्याचा दावा केल्यानंतर केंद्र-राज्य यांच्यात वादाची ठिणगी पडली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आरोपावर टीका केली होती. यानंतर राजेश टोपे यांनी आकडेवारीच जाहीर करत वस्तुस्थिती मांडली होती.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राला होणारा लसीचा पुरवठा येत्या आठवडाभरात न वाढल्यास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून लस घेऊन अन्य राज्यांत जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही,” असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना दिला आहे.