"फाटक्या जीन्स"नंतर पुन्हा एकदा तीरथ सिंह रावत चर्चेत...
फाटक्या जीन्स (रिप्ट जीन्स) घालणाऱ्या महिलांच्या संस्कारासंदर्भात वक्तव्य केल्याने चर्चेत आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा चुकीचा संदर्भ देणारं वक्तव्य करत विरोधकांना आयती संधी उपलब्ध करुन दिलीय. ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं’, असं वक्तव्य रावत यांनी केलं आहे.
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते तर काय झालं असतं कोणीही सांगू शकत नाही. पंतप्रधान मोदींनी दिलासा देणारे निर्णय घेतले, इतर देशांपेक्षा भारताने कोरोना परिस्थिती अगदी छान पद्धतीने हाताळली आहे. अमेरिकेने आपल्यावर २०० वर्षे राज्य केलं, ज्यांनी जगावर राज्य केलं ते या कोरोनाचा सामना करताना डळमळत आहेत. अमेरिकेमध्ये २.७५ लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था असणाऱ्या इटलीमध्ये करोनामुळे ५० लाख जणांचा जीव गेला असून लवकरच तिथे नव्याने लॉकडाउन लागू होणार आहे,” असंही रावत म्हणाले.
मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारे वादग्रस्त आणि टीका होणारं वक्तव्य करण्याची रावत यांची ही तिसरी वेळ आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यात भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाप्रमाणे पुजा केली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.