कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर राहुल गांधींकडून ‘तो’ व्हिडीओ रिट्विट, म्हणाले…
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.या ट्वीटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या सत्याग्रहामुळे अहंकाराची मान झुकल्याचं म्हटलं. तसेच शेतकऱ्यांचं अभिनंदनही केलं.
राहुल गांधी यांनी ट्वीटरवर ‘“देशाच्या अन्नदात्याने केलेल्या सत्याग्रहामुळे अहंकाराची मान झुकली. अन्यायाविरोधातील या विजयासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन. ‘जय हिंद, जय हिंद का किसान’! असं म्हणत जानेवारी २०२१ चा एक व्हिडीओ रिट्विट करत ‘माझे शब्द लिहून ठेवा’ म्हणत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केलाय.
या व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले होते, “शेतकरी जे करत आहेत त्यावर मला अभिमान आहे. माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मी त्यांच्यासोबत उभा आहे. मी माझ्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांचा विषय मांडला. आम्ही यापुढेही हे करतच राहू. माझे शब्द लिहून ठेवा, मोदी सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. मी काय म्हटलोय ते लक्षात ठेवा.” काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अहंकार तुटून माझ्या देशाचा शेतकरी जिंकल्याचं म्हटलंय. प्रियंका गांधी यांनी देखील राहुल गांधी यांचं ट्वीट रिट्विट केलंय.