top of page

अंधेरी पोटनिवडणूक : राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र; काय म्हटलं आहे पत्रात? ...

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार असून राजकीय घडमोडींना वेग आला आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

“माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.


“मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

आज सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनी फडणवीसांना हे पत्र लिहिलंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.त्यामुळे भाजप उद्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे पाहावं लागेल.


bottom of page