आषाढी वारीनंतर देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल
सांगली: पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील कोरोना आटोक्यात येईल, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलं आहे. "पायी वारी करण्यास परवानगी द्यावी" अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल असं ते म्हणाले आहेत. सर्व राजकीय कार्यक्रम होत असतील तर पंढरपूरची वारी का नको, असा सवाल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केला.
“संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. आपल्या सर्वांना कोरोनामुक्त भारत व्हावा असं वाटतं आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी,” असंही यावेळी ते म्हणाले.
राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन वारकरी वारीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. असे असताना चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असा निर्णय घेतला. प्रत्यक्षात मात्र शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.याचा वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात येतो. पंढरपूरच्या वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी पायी दिंडीला परवानगी द्यावी.’’ असंही भिडे म्हणाले.