top of page
Writer's pictureMahannewsonline

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आता प्रशासनाबरोबर नागरिकांनीही पुढाकार घ्यावा

भारत फोर्जकडून 24 गावांना कोविड रोखण्यासाठी लागणाऱ्या साधनांचे वाटप

सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाचे, राज्याचे व जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल, पोलीस व आरोग्य विभाग पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून काम करीत आहेत. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांची मदत घेऊन तिसऱ्या लाटेचा अधिकचा प्रभाव जाणवणार नाही यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु केले पाहिजे या कामात नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

भारत फोर्ज लि. पुणे यांच्याकडून सीएसआर निधीतून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव व माण तालुक्यातील एकूण 24 गावांना कोविड-19 साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व साधनांचे वितरण धामणेर ता. कोरेगाव येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वितरण प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, भारत फोर्जच्या लिना देशपांडे, सुनिल माने, शहाजी क्षीरसागर यांच्यासह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

भारत फोर्जचे कोरेगाव, खटाव व माण तालुक्यातील 24 गावांमध्ये विविध विकासात्मक कामे सुरु आहेत. भारत फोर्जचा उपक्रम अतिशय चांगला असून त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवून विविध गावांचा विकास केला पाहिजे. 24 गावांची गरज ओळखून कोरोनाच्या लढ्यासाठी लागणरी औषधे व इतर साहित्य आज पुरविले आहे. त्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, आज गावोगावी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना चांगला दिलासा मिळालेला आहे. ग्रामदक्षता समितीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. गावांना भेटी देण्यावर भर असून भेटीप्रसंगी ज्या अडचणी सांगण्यात येतात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी आपल्या गावातच उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच ग्रामदक्षता समितीने कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी. या कामासाठी शिक्षकांची मदत घ्यावी याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत. लसीचा अधिकचा पुरवठा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. लसीकरणबाबत योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भारत फोर्जचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत फोर्ज गेली साडेतीन वर्ष विविध गावांमध्ये काम करीत आहे. सातारा जिल्ह्यातील 24 गावांमध्ये पाणी, आरोग्य, अंतर्गत रस्ते, गटारे, शिक्षण यासाठी काम करत आहे. हे काम करीत असताना नागरिकांचे सहकार्य मिळाले. ही 24 गावे आदर्श गाव म्हणून पुढे घेतील, असा विश्वास भारत फौर्जच्या लिना देशपांडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाजी क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमास धामणेर येथील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


bottom of page