शाळेची भिंत कोसळली; एकाच कुटुंबामधील ९ जण ढिगाऱ्याखाली ...
अमरावती : अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एकाच कुटुंबामधील ९ जण ढिगाऱ्याखाली दबल्याने जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल (रविवारी) घडली. मोर्शी तालुकयातील उदखेड येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दबलेल्यांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.
उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला अनेक वर्षांपासून कुरवाडे कुटूंबीय राहातात. परिसरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शाळेची भिंत कुटुंबीयांच्या घरावर पडली. रविवारी सकाळी कुरवाडे कुटुंबीय साखरझोपेत असतानाच ही घटना घडली. त्यामध्ये कुरवाडे यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य दबले गेले. आर्यन मंगेश कुरवाडे (६), सुर्यकांता मंगेश कुरवाडे (२६), नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (६५), मंगेश लक्ष्मणराव कुरवाडे (३१), गजानन लक्ष्मणराव कुरवाडे (३४), अंबिका गजानन कुरवाडे (३०), , श्रेया गजानन कुरवाडे (१२) व सोनाली गजानन कुरवाडे (९), साक्षी गजानन कुरवाडे (१४) अशी भिंतीखाली दबून जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली. जिल्हा परिषद शाळेची भिंत कोणत्याही क्षणी पडू शकते, अशी तक्रार कुरवाडे कुटुंबियांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार करूनसुध्दा काही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे.