भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याची आठवण त्यांना करुन दिली. यावरुन गोपीचंद पडळकर यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी पडळकर यांना टोला लगावला आहे.
“महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झालं आहे, याचंही भान यांना राहिलं नाही”, असं ट्विट करत पडळकरांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला.होता.
गोपीचंद पडळकर यांच्या या ट्वीटला बाळासाहेब थोरातांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट करतच उत्तर दिलं आहे. ‘पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’, अशी टीका त्यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते –
देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेलं नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.