सोयाबिन पिकाची उत्पादकता व गुणवत्ता चांगली राखण्यासाठी शेतकऱयांनी काळजी घ्यावी
खरीप हंगाम लवकरच सुरु होत असून मागील वर्षी सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असतांना चक्री भुंग्याचा प्रार्दुभाव दिसून आला. तसेच कापणीचे कालावधीत सोयाबिन पिक पावसात सापडल्याने उत्पादनात घट व बियाणाची गुणवत्ता , प्रत खराब झाल्यामुळे यावर्षी बियाण्यांचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबिन पिकाची उत्पादकता व गुणवत्ता चांगली राखण्यासाठी शेतक-यांनी सोयाबिन पिकाची पेरणी करतांना काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी केले आहे.
75 ते 100 मिली मीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. अवकाळी पावसाला मोसमी पाऊस समजून सोयाबिन पिकाची पेरणी करु नये, मुख्य मोसमी पावसाला सुरुवात झाल्यांनतर 75 ते 100 मीली मीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी अन्यथा उगवण कमी होते. सोयाबिन बियाणे 4 सेमी मीटर पेक्षा जास्त खोल पेरु नये अन्यथा उगवण कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबिन पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करावी. बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी 22 किलो बियाणे लागते व एकरी 8 किलो सोयाबिन बियाणाची बचत होते. उगवण चांगली होते. तसेच उत्पादनात वाढ होते. टोकन पध्दतीने पेरणी करावी. त्यामुळे एकरी 8 किलो बियाणे लागते व बियाणात बचत होते. पेरणी करण्यापुर्वी सोयाबीन बियाणास प्रथम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करुन नंतर रायझोबिअम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करतांना बियाणे जोरात घासू नये. अन्यथा बियाणाचा पापुद्रा पातळ असल्याने डाळ होण्याची शक्यता असते. पेरणी करण्यापूर्वी बियाणाची उगवण शक्ती तपासून पेरणी करावी. याप्रमाणे सोयाबीनची पेरणी केल्यास उगवण योग्य प्रमाणात होऊन उत्पन्नात चांगली वाढ होते.