top of page

तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या, ६ महिनेच शिल्लक; शरद पवार यांनी सांगितला किस्सा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॅन्सरची शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी एका नव्या डॉक्टरने तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय, मला समजलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे सहा महिन्याचं आयुष्य उरलं आहे.” ही गोष्ट आहे २००४ ची. पण, कॅन्सरवर यशस्वीपणे मात करून तेव्हापासून आज २०२२ पर्यंत मी महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यात जातो. संकटाशी सामना करण्याचा आत्मविश्वास तयार करावा, त्याविरुद्ध लढावे आणि जिंकावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले. औरंगाबाद येथील मराठवाडा कॅन्सर हॉस्पीटलच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी औरंगाबादेतील सूतगिरणी चौकाजवळ मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे उद्घाटन झाले. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “२००४ साली मला कॅन्सरचं निदान झालं होतं. मी दहा दिवस रुग्णालयात होतो. तिथे एका नवख्या डॉक्टरशी मी गप्पा मारायचो. तेव्हा मी त्याला विचारलं, माझ्याकडे पाहून तुला काय वाटतं, मला काय झालं असेल? त्यावेळी तो डॉक्टर म्हणाला, खरं सांगू का…, मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो. तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय, मला समजलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे सहा महिन्याचं आयुष्य उरलं आहे.”

त्यावर मी त्याला सांगितलं, पैज लाव… मी काही इतक्या लवकर जात नाही. पुढे हसत त्याला सांगितलं, अगदीच जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यावरच मी जाईन, तेव्हा २००४ साल होतं आज २०२२ आहे, मी अजून जिवंत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो, लोकांची कामे करतो. ” असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

एखाद्याला कॅन्सर झाला की घरातले वातावरण भीतिदायक बनते. रुग्ण जाणार अशीच भीती निर्माण होते. पण आजारात घाबरून जाण्यापेक्षा या संकटावर आपण मात करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असते. हे युद्ध जिंकण्याचा निर्धार सर्वात आवश्यक असतो, तरच आपण संकटाशी मात करू शकतो.’ असं ही ते म्हणाले.



bottom of page