top of page
Writer's pictureMahannewsonline

आरोप गंभीर ... सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू पण…

बदली झाल्यानंतरच परमबीर सिंग यांनी केले आरोप

फडणवीस दिल्लीत जाऊन आल्यावर हे पत्र समोर ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील गृहमंत्र्यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.



गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले


”परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झाले असल्याचे त्यांनी सांगितलं.



सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन आल्यावर हे पत्र समोर आलं आहे व बदली झाल्यानंतरच परमबीर सिंग यांनी हे आरोप केले आहेत. असं ही पवार म्हणाले.



गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय़ घ्यावा. १०० कोटी कुणाकडे गेले, याचा उल्लेख त्या पत्रात नाही. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं.


bottom of page