आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील....
मराठा आरक्षणाच्या प्रकरणी १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असून "आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील" असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते.
१६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्याचा इशाराही संभाजीराजेंनी यावेळी दिला आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असंही संभाजीराजे म्हणाले.