मराठा आरक्षण : माघार घेतली तर लक्षात ठेवा....
भाजपाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घ्यावी, मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही असं सांगत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. तसंच २७ तारखेला आपण भूमिका मांडणार असून त्यानंतर माघार घेतली तर लक्षात ठेवा असा इशाराच यावेळी त्यांनी आमदार आणि खासदारांना दिला आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नसून तुम्ही मार्ग काय काढून देणार आहात ते सांगा,” अशी विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
“मी समंजसपणाने भूमिका घेतली होती, त्याच्यावर शंका घेण्यात आली. माणसं जगली तर आऱक्षणासाठी लढू शकतो. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. एकदा पाय टाकला तर माघार नाही आणि मी हे करुन दाखवलं आहे. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.
“माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र फिरुन पुन्हा एकदा भावना समजून घेणार आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका मांडणार. पण यानिमित्ताने मला सर्व आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की, समाजाची भावना मांडल्यानंतर माझं तुझं केलं तर बघा,” असा इशाराच संभाजीराजेंनी दिला आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. अजून मी आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी दोन मिनिटं लागतात, पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही. २७ तारखेला मराठा समाज काय करणार हे सर्वांना कळेल. पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावं. आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.