दहावीचा निकाल ९६.९४ टक्के; मुलींनीच मारली बाजी
विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत निकालाची घोषणा केली. राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९९.२७ टक्के इतका तर सर्वात कमी नाशिक विभागाचा ९५.९० टक्के लागला आहे.
एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी प्रमाणे दहावीत देखील मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० टक्के इतकी जास्त आहे. मुलींची ९७.९६ टक्के इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे.
विभाग निहाय निकाल पुढील प्रमाणे...
कोकण: ९९.२७
कोल्हापूर: ९८.५०
लातूर: ९७.२७
नागपूर: ९७.००
मुंबई: ९६.९४
औरंगाबाद: ९६.३३
अमरावती: ९६.८१
पुणे: ९६.१६
नाशिक: ९५.९०
राज्यातून नियमित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ लाख ५८ हजार २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील २९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. तर १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या १२ हजार २१० इतकी आहे.