…नाहीतर कुटुंबासोबत स्वत:ला पेटवून घेईन; उमेदवाराने थेट निवडणूक आयोगालाच लिहिलं पत्र
उत्तर प्रदेशमध्ये दोनच दिवसांत विधानसभा निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तेथील प्रचार शिगेला पोहोचला असून नोएडामधील समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांनी स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास कुटुंबीयांसह स्वत:ला पेटवून घेण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.
सुनील चौधरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून भाजपाकडून जाच होत असल्याची तक्रार केली आहे. यासोबतच, त्यांनी स्थानिक पोलिसांकडून देखील छळ केला जात असल्याचं म्हटलं आहे. “भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याची वारंवार तक्रार केल्यानंतर देखील स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही”, अशी तक्रार त्यांनी पत्रात केली आहे.
रविवारी भाजपा आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर सुनील चौधरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. “मी एका सामान्य कुटुंबातला असून प्रामाणिकपणे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, स्थानिक सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांचा छळ करणं सुरू ठेवलं आहे. त्यांना मारहाण केली जाते, धमकावलं जातं, मध्यरात्री त्यांच्या घरांची झडती घेतली जाते”, असं सुनील चौधरी म्हणाले आहेत.