top of page
Writer's pictureMahannewsonline

आर्यन खान प्रकरण : भानूशालीने पाठवलेल्या यादीत आर्यनचं नावच नव्हतं!; सुनील पाटील यांचा गौप्यस्फोट

आर्यन खान प्रकरणाचे मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा आरोप भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यानंतर आता सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. भानूशालीने पाठवलेल्या यादीत आर्यनचं नावच नव्हतं तसेच समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही, असे अनेक धक्कादायक खुलासे सुनील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले .

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.

“ आर्यन खान प्रकरणातला मास्टरमाईंड मी नाही. या केसमधले मास्टरमाईंड कुणीतरी वेगळेच आहेत. माझा मनीषशी संपर्क मित्र म्हणून गेल्या १०-१२ वर्षांपासून आहेत. मी मनीषसोबत कंपनीच्या एका कामासाठी २७ तारखेला अहमदाबादला गेलो होतो. किरण गोसावीसोबत मी बदली रॅकेटमध्ये आहे असं ते म्हणतात. पण मी किरण गोसावीला ४ सप्टेंबरपासून ओळखतो. म्हणजे घटनेच्या काही दिवस आधीपासून. तो माझ्या मित्राचा भाऊ आहे. २२ तारखेला माझी किरण गोसावीसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर मी २५-२६ ला परत आलो. २७ ला मनीष भानुशालीने सांगितलं की अहमदाबादला जाऊ, काम आहे. त्यानंतर आम्ही अहमदाबादला गेलो”, असं सुनील पाटील यांनी यावेळी सांगितलं.

सुनील पाटील यांनीच समीर वानखेडे यांना ड्रग्ज पार्टीविषयीची टिप दिल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यावर बोलताना सुनील पाटील यांनी हे आरोप फेटाळत मुंबई ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि अरबाज खान यांचं एनसीबीच्या लिस्ट मध्ये नाव नव्हतं असाही गौप्यस्फोट सुनिल पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची टीप आपल्याला मिळाली नव्हती तर निरज यादवने याची टीप मनिष भानुशालीला दिली होती असंही सुनिल पाटील म्हणाले. धवल भानुशाली आणि नीरज यादव यांनी संध्याकाळी ४ वाजता मला फोन केला होता. मनीष भानुशाली आणि किरण गोसावी, नीरज यादव तेव्हा गांधीनगर मंत्रालयात गेले होते. त्यांनी सांगितलं की कॉर्टेलिया क्रूजवर रेव्ह पार्टी होणार आहे. तुमचे एनसीबीचे काही काँटॅक्ट असतील, तर द्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं हे काम नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या”, असं पाटील म्हणाले.

सॅम, मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत काही डील केली होती का? या प्रश्नावर पाटील यांनी त्याचा घटनाक्रम सांगितला. “त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते रात्रभर मुंबईत होते. मी ४ तारखेपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यांचा मला एकदा फोन आला की आमची बोलणी चालू आहेत. मला मनीषने सांगितलं की शाहरुख का लडका भी है.. मग मी म्हटलं तुम्ही बघून घ्या जे काही करायचंय ते करा”, असं पाटील म्हणाले. “त्या दिवशी त्यांच्या बैठका सुरू होत्या. सकाळी साडेआठला मला फोन आला की आमची डील झाली आहे, ५० लाख रुपये टोकन दिलं आहे. किरण गोसावी मला म्हणाला की कुठे ठेऊ. मी राहातो वाशीला, पण इथे पैसे ठेवायला जागा आहे का? तेवढंच माझं आणि प्रभाकरचं बोलणं झालं. प्रभाकरला पैसे मिळाले, त्याने कुठे ठेवले याविषयी मला काहीही माहिती नाही”, असं देखील पाटील यांनी सांगितलं.

आपल्याला चार-पाच दिवसांपूर्वी मनिष भानुशाली आणि धवल भानुशाली यांनी मला दिल्लीला बोलावलं. त्यावेळी मी अहमदाबादमध्ये होतो दिल्लीमध्ये त्यांनी मला एका हॉटेलमध्ये ठेवलं. त्यावेळी मला कुठेही बाहेर जायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मला मारहाण करण्यात आली असंही पाटील यांनी यावेळी सांगितले.


bottom of page