तमिळनाडूत पावसाचा हाहाकार; चार जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद
चेन्नई : तमिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले होते. पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अनेक शासकीय कार्यालये आज सोमवारी देखील बंद राहणार आहेत. तसेच खासगी कंपन्यांनी सुट्टी जाहीर करावी अथवा कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.
बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव देखील तुडूंब भरले आहेत. त्यामुळे नद्यामध्ये पाणी सोडल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अड्यार नदीच्या काठावर असलेल्या कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात पुराचा इशारा देण्यात आला आहे. तिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तयारीबाबत चर्चा केली आहे आणि एग्मोर, पाडी पूल, पाडी पूल आणि जवाहर नगरसह 14 जलमय भागांना भेट दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मदत कार्यात केंद्राकडून सहकार्य करण्याचे आश्वास दिले आहे. याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.