आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती - राजेश टोपे
मुंबई - राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. एकीकडे वैद्यकीय साधनांचा तुटवडा तर दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर 100% रुग्ण सेवा पद भरण्याची काल मंत्री मंडळाची परवानगी मिळाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करण्यात येणार असून यासंबंधीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये 12 हजार पदे ही क आणि ड वर्गातील असणार आहेत. तर 2 हजार मेडिकल ऑफिसर पदांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय 2 हजार टेक्निकल पद भरणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.