top of page
Writer's pictureMahannewsonline

'उजनी'तून भीमा नदी पात्रात पाणी सोडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त (१२१.९३ टीएमसी) पाणी भरले आहे. त्यामुळे रविवार सकाळी सात वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात २० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने व दौंड येथून येणारा विसर्ग वाढल्याने पूरनियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९७.२२० मीटर होती. तर उजनीतील पाणीसाठा १२१.९३ टीएमसी झाला आहे. धरणात ५८.२७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून उजनीची टक्केवारी १०८.७६ इतकी झाली आहे. दौंडमधून दहा हजार ५५१ चा विसर्ग सुरू आहे तर बंडगार्डन येथून ९ हजार ५० चा विसर्ग करण्यात असल्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा वाढत चालल्यामुळे रविवारी सकाळी सात वाजल्यापासून धरणातून २० हजार क्युसेक्सने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग विचारात घेऊन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त केला जाईल असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे. उजनीतून पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



bottom of page