UPSC च्या मुलाखतींमध्ये राखीव कोट्यातील उमेदवारांना गुण देताना भेदभाव
दिल्लीच्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी केला गंभीर आरोप
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षांसंदर्भात दिल्लीतील एका मंत्र्यानेच मोठा आरोप केला आहे. दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी यूपीएससीच्या संचालकांना पत्र लिहून “केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना गुण देताना जातीआधारीत भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे संचालक प्रदीप कुमार जोशी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी यूपीएससीच्या मुलाखतींसंदर्भात तक्रार केली आहे. “यूपीएससी मुलाखतींमध्ये राखीव कोट्यातील अनेक उमेदवारांना जातीआधारीत भेदभावाचा सामना करावा लागत आहे. या उमेदवारांना गुण देताना पद्धतशीरपणे भेदभाव केला जात आहे. मला यासंदर्भात अनेक समाजाच्या उमेदवारांनी पत्र लिहून त्यांच्या भावना सांगितल्या आहेत.
“राखीव कोट्यातील उमेदवारांची जात उघड न केल्यास अशा प्रकारचा भेदभाव टाळता येईल. राखीव आणि खुला प्रवर्ग असे गट न करता सरसकट गट करून मुलाखती घेतल्या तर या गोष्टीला आळा बसेल”, तसेच “हा पर्याय UPSC ला सहज अंमलबजावणी करता येण्यासारखा आहे. यामुळे सर्व उमेदवारांना मुलाखतीच्या टप्प्यावर समान संधी आणि न्याय्य वागणूक मिळू शकेल”, असंही त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.