लवकरात लवकर भारत सोडा; अमेरिकेचे नागरिकांना आवाहन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून दैनंदिन रुग्णसंख्या नवनवे उच्चांक गाठताना दिसत आहे. आरोग्यसेवेवर परिणाम होऊन ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे.
भारतात अत्यंत वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३६४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे. अमेरिकेकडून यासंबंधी ॲडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आलेली असून नागरिकांनी भारतात जाऊ नका किंवा लवकरात लवकर भारत सोडा असं सांगण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमानं सुरु आहेत.