११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी संवाद साधला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्यास सागितलं. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वयाने काम करावे त्यातूनच कोरोनावर मात करणे शक्य आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं.
पुढील दोन-तीन आठवडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘युद्धपातळीवर’ प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं. “कोरोनाशी लढताना टेस्टिंग हा एकमेव मार्ग आहे. ७० टक्के आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचं आपलं टार्गेट आहे. टेस्टिंगमध्ये काही अधिकाऱ्यांकडून आळशीपणा होत असल्याचा रिपोर्ट माझ्याकडे आला आहे. टेस्टिंग केल्याशिवाय योग्य निकाल येणार नाही,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
रुग्णसंख्या जास्त असल्याने तुम्ही चिंता करु नका, आपली कामगिरी खराब आहे अशा दबावात राहू नका. मी आताही तुम्ही टेस्टिंगकडे लक्ष द्या असं सांगत आहे. तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या अजून वाढताना दिसेल,” असं नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढताना आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला आपण समर्थन देत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
“राज्यांमध्ये सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन जणू काही स्पर्धा सुरु आहे. हे राज्य पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. ते राज्य खूप चांगलं काम करत आहे. राज्यांची तुलना करणं आजकाल एक फॅशन झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकावर लसींच्या पुरवठ्यावरुन केलेल्या टीकेनंतर नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे.