राखी पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी भावाने सख्ख्या बहिणीचा गळा आवळून केला खून
बहिण-भावाच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा राखी पौर्णिमेचा सण नुकताच सर्वत्र साजरा करण्यात आला. अन् रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून तर प्रियकराचा गोळ्या घालून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. चोपडा शहरातील चोपडा-वराड रस्त्यावर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे दोघांचा खून केल्यानंतर आरोपी स्वतः पिस्तुलासह पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक जण पिस्तुल घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितले. चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी चोपडा वराड रस्त्यावरील एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यात मुलाची गोळी मारून तर मुलीच्या गळा आवळून खून केल्याची स्पष्ट झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
वर्षा समाधान कोळी( २०, रा. सुंदरगढी,चोपडा), राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा चोपडा) अशी अशी मयत प्रेमी युगलाची नावं आहेत. राकेश आणि वर्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते पळून जाणार असल्याची माहिती वर्षाच्या अल्पवयीन भावाला समजली. त्यानंतर वर्षाच्या भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीचा रुमालाने गळा दाबून हत्या केली.